सा हि त्या क्ष र

युआन श्वांग : भाग ५ वा -सतीश सोनवणे

Story Of A chinese Traveller

( प्रसिद्ध लेखक जगन्मोहन वर्मा यांच्या सुयेन च्वांग या पुस्तकाचा क्रमश: अनुवाद . )

प्रकरण पाचवे-भारतयात्रेला सुरुवात:


युआन श्वाग चिनचाऊ चा भिक्षू हियावत्ता’ बरोबर चांगआन सोडून चिनचाऊला आला. तो एक रात्र तिथेच राहिला. दुसऱ्या दिवशी त्याला लान चाऊ येथील एक साथीदार भेटला जो चिन चाऊला काही कामासाठी आला होता आणि त्याच्या घरी जात होता. तो त्याच्यासोबत चिनचाऊहून लानंचाऊ पर्यंत आला आणि तिथेही एक रात्र काढली. तेथे त्याला काही सरकारी स्वार भेटले जे एका सरकारी अधिकाऱ्याला लानचाऊ पर्यंत पोहोचवून लिआंगचाऊला परतत होते. युआन श्वाग गुपचूप घोड्यावर बसला आणि त्यांच्या मागोमाग लिआंगचाऊला पोहोचला.

लिआंगचाऊ हे एक असे ठिकाण होते जिथे तिबेटचे आणि इतरही लोक कोणत्याही अडथळ्याशिवाय येत-जात असत पाश्चिमात्य लोकांसाठी ते एखाद्या प्रमुख स्थानका सारखे होते. येथे आल्यानंतर युआन श्वाग सोबत्यांच्या शोधात होता त्याच दरम्यान भिक्षूंना आणि गावाला त्याच्या आगमनाची बातमी मिळाली. मग सर्वांनी येऊन त्याला घेराव घातला आणि त्याला सूत्रे समजावून सांगण्याची विनंती केली. युआन श्वागला त्यांना निराश करणे योग्य वाटले नाही आणि त्यांचे म्हणणे मान्य करून कथा सुरू केली. कथेत त्यांनी सुत्रांचे दडलेले रहस्य आणि अर्थ सांगायला सुरुवात केली. दूरदूरवरून लोक त्यांचे कथन ऐकण्यासाठी येत असत आणि तृप्त होऊन घरी परतत असत. काही दिवसांतच त्याची कीर्ती इतकी पसरली की पश्चिमेकडील दूरच्या देशांतून जे प्रवासी आणि व्यापारी लिआंगचाऊला आले होते, त्यांनी त्याची कहाणी ऐकली आणि त्याची कीर्ती, त्याची विद्वत्ता आणि सदाचारी आचरणाची बातमी घेऊन आपापल्या देशात गेले. त्याच्या गुणांची बातमी राजदरबारात पोहोचली आणि प्रत्येकजण त्याला पाहण्यासाठी आतुर झाला आणि त्याला पाहण्यासाठी दूरदूरवरून लोक येत.

त्याच काळात चीनच्या सम्राटाचा आणखी एक आदेश निघाला आणि त्याच पूर्वीच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना कळविण्यात आले की बाहेर जाणाऱ्यांवर कडक नजर ठेवली जावी आणि कोणत्याही परिस्थितीत कोणालाही बाहेर पडू देऊ नये. . तपासासाठी लिआंगचाऊ मध्ये नवीन शासक नियुक्त करण्यात आला आणि त्याला कठोर नियंत्रण ठेवण्याची सूचना देण्यात आली जेणेकरून कोणीही सीमेच्या पलीकडे जाऊ नये. बाहेर जाण्याला आळा घालण्यासाठी सीमाभागावर कडक नजर ठेवावी. कोणती व्यक्ती सीमेपलीकडे जाण्याची योजना आखत आहे हे शोधून काढण्यासाठी, तपास करत राहण्यासाठी, माहिती मिळाल्यावर त्यांनी गुप्तपणे राज्यकर्त्यांना कोठे आहे याची माहिती द्यावी यासाठी सीमा प्रांताच्या कानाकोपऱ्यात फिरण्यासाठी अनेक हेर नेमले गेले. कोणी व्यक्ती बाहेर जाण्याच्या प्रयत्नात असेल तर तो ब्यक्ती कोण? कोठे राहात आहे आणि तो तिथे का आहे आणि त्याला कुठे जायचे आहे आणि तो किती दूर पोहोचला आहे? याची माहिती काढण्यासाठी चहूबाजूंनी कडक बंदोबस्त लावण्यात आला आणि सीमेबाहेर पाऊल टाकणेही कठीण झाले.
दरम्यान,युआन श्वाग भारताकडे रवाना झाल्याची बातमी आधीच लियांगचाऊ आणि पाश्चिमात्य देशांमध्ये पसरली होती. त्याच्या विद्वत्तेची बातमी मिळाल्याने सर्वजण त्याची वाट पाहू लागले. ही अशी गोष्ट होती जी लपवणे अत्यंत कठीण होते. गुप्तहेराने हे जाणून घेतले आणि ते लिआंग चाउच्या नवीन अधिपतीला दिले आणि त्याला युआन श्वांगच्या मुक्कामाची सर्व माहिती सांगितली आणि सांगितले की तो धम्माचा प्रचार करण्यासाठी दररोज एका विशिष्ट ठिकाणी येतो. तो साथीदाराच्या शोधात असून लवकरच तो भारतात जाणार आहे. ही बातमी ऐकून राज्यकर्त्याने युआन श्वांगला बोलावले आणि त्याच्याजवळ पोहोचल्यावर तो म्हणाला की तुम्ही पश्चिमेला जाणार आहात असे ऐकले आहे. युआन श्वांगने उत्तर दिले की होय, कल्पना आहे पण बघू मी कधी जाऊ शकतो. सत्ताधाऱ्यांनी पुन्हा विचारले तिथे काय काम आहे? युआन श्वांग म्हणाला की, पश्चिमेला जाण्याची माझी कल्पना आहे कारण आपल्या देशातील धार्मिक ग्रंथांमध्ये मोठा गोंधळ आहे. मला भारतात जाऊन देवाच्या वचनांचा अभ्यास करायचा आहे आणि ते ग्रंथ माझ्या देशात आणायचे आहेत आणि इथल्या विचारवंतांचे गैरसमज आणि अपभ्रंश दुरुस्त करायचे आहेत आणि त्यांचे भाषांतर करून मला माझ्या देशातील साहित्याचा साठा भरायचा आहे. चांग आन हून आल्यानंतर इथे आलो आणि सोबती मिळाल्यावर पुढे जाईन, याचे कारण हेच आहे. त्याचे म्हणणे ऐकून राज्यकर्त्याने त्याला खूप समजावले आणि सांगितले की बघा, यावेळी कोणीही सीमा ओलांडू नये हीच सम्राटाची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत, आपण आपल्या देशाबाहेर जाणे कधीही उचित नाही. तुम्ही हा विचार सोडून द्या आणि चांगआनला परत या. जर तुम्हाला पटत नसेल तर लक्षात ठेवा तुम्ही हजार वेळा प्रयत्न करा पण तुम्ही यातून बाहेर पडू शकणार नाही. अत्यंत कडक तपास सुरू आहे, सीमेवर सर्वत्र कडक सुरक्षा आहे. तुम्ही नक्कीच कुठेतरी पकडले जाल. त्यावेळी मोठा त्रास होईल. युआन श्वांग त्यावेळी गप्प राहिला आणि तेथून उठून आपल्या निवासस्थानी गेला. तिथे आल्यानंतर काय करायचं आणि कुठे जायचं या संभ्रमात तो पडला होता. कोणी साथीदार सापडत नव्हता. कोणासोबत जायचा मार्ग कळत नव्हता! तो सर्व संकटांचा सामना करण्यास तयार होता परंतु त्याच्या ध्येयापासून हटू शकत नव्हता. शेवटी त्यांनी आपल्या मनातील विचार दूदविई कडे व्यक्त केले, ‘ हे त्यांचे शब्द ऐकून दूदविई खूप आनंदित झाले आणि त्यांचे खूप कौतुक करू लागले. तो म्हणाला- काळजी करू नका, काहीतरी उपाय सापडेल. ” दूदविई हा अतिशय विद्वान आणि प्रभावशाली श्रमण होता. अनेक श्रमण यांच्याजवळ शिकण्यासाठी राहत असत. त्याने आपल्या दोन शिष्यांना घेऊन युआन श्वांगला सीमा ओलांडण्याचा आदेश दिला. युआन श्वांग मनात खूप आनंदी झाला आणि सामान बांधून गुपचूप त्या दोन श्रमणांसह तिथून निघून पश्चिमेचा मार्ग धरला. (क्रमश:)

********

अनुवादक: सतीश सोनवणे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top