सा हि त्या क्ष र

‘भवरा ‘च्या निर्मितीची कथा : विजय जाधव,अंबड

बहुचर्चित ‘पांढरकवड्या ‘ कादंबरीचे लेखक विजय जाधव यांच्या ‘भवरा’ या कथासंग्रहाच्या निर्मितीमागील प्रेरणा

चार वर्षांपूर्वी कोरोनाच्या महामारीने जग हादरून गेले होते. मानव जातीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या एकाकी काळात मी बरीच पुस्तके वाचली, पण यामध्ये प्रसिद्ध लेखक बाबुराव बागुल यांचे ‘सूड’ हे पुस्तक वाचण्यात आले आणि मला हे पुस्तक खूप आवडले. काही लेखकांची आणि आपली काय नाती असतात कुणास ठाऊक! मी कॉलेजमध्ये असताना बाबुराव बागुल यांची ‘मरण स्वस्त होत आहे’ हे पुस्तक वाचले होते. ते मला खूप आवडले होते. पुढे २०१४ साली माझा ‘दाखला’ हा पहिला कथासंग्रह प्रकाशित झाला. या कथासंग्रहास २०१५ चा ‘यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकचा’ प्रतिष्ठेचा ‘बाबुराव बागुल’ कथा पुरस्कार मिळाला. त्यामुळे हुरुप येऊन लिहू लागलो आणि ‘पांढरकवड्या’ ही कादंबरी लिहिली. ती स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेडच्या एम.ए च्या अभ्यासक्रमासाठी लागली .


त्यानंतर कोरोनाच्या थैमानात माणूस माणसापासून दूर गेला. या महामारीने बाधित व्यक्तीचा श्वास हॉस्पिटलमध्ये कोंडला गेला. या महामारी पेक्षा त्या व्यक्तीला एकाकीपणाने जास्त घेरले. या काळात मी बाबुराव बागुल यांचे ‘सूड’ हे पुस्तक वाचले. तसे हे पुस्तक फक्त ६४ पानांचे आहे. त्याला कादंबरी म्हणावे की दीर्घकथा हा विषय आजही चर्चेचा आहे; पण या पुस्तकापासून प्रेरणा घेऊन मी दीर्घकथा लिहायला सुरुवात केली .
आजचे दैनंदिन जीवन प्रचंड व्यस्त बनले आहे. करिअर करण्याच्या नावाखाली कुटुंब सुसाट धावू लागले आहे. अशा धावत्या कुटुंबामध्ये वृद्ध माणसं ही ओझे बनली. आजूबाजूला त्यांच्या वेदनांचे आवाज ऐकू येऊ लागले… आणि एके दिवशी वर्तमानपत्रांमध्ये बातमी वाचली की, मंगरूळच्या बंधार्‍यामध्ये वृद्ध दांपत्याने उड्या मारून आत्महत्या केली. बाजूला त्यांच्या पिशव्या ,चपला आणि काठ्या पडलेल्या. आपल्या वृद्धापकाळात ज्यांनी आधाराच्या काठ्या व्हायचं त्यांनीच त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. यातूनच मी ‘सिंगुस्त’ ही दीर्घकथा लिहिली. आज शहरी भागात तर वृद्धांना मोजताना तुमच्या घरामध्ये किती डस्टबिन आहेत असा प्रश्न विचारू लागले .
आज घराघरांमध्ये माणसं अस्वस्थ होत आहेत.पुरुषी व्यवस्थेमध्ये स्त्रियांवर अन्याय- अत्याचार होतात ;तर वृद्धांच्या सांभाळण्यामध्ये घराच्या कर्त्या पुरुषाची दमकोंडी होते. स्त्री आणि पुरुष यांच्या पलीकडेही एक शापित जग आहे ज्याकडे समाज अतिशय तुच्छतेने पाहतो ते तिसरे जग आहे.ते जग आहे तृतीय पंथीयांचे. एका प्रवासामध्ये भेटलेल्या एका तृतीय पंथीयासोबत बोलताना मानव जातीचा एक घटक किती भयंकर यातना सहन करतो आहे हे लक्षात आले. पुढे एका मित्राने त्याच्या एका तृतीय पंथीय मित्राशी ओळख करून दिली. त्या तृतीय पंथीयाचे ते जग अतिशय भयंकर होते. ते जग मी ‘कानपिळणी’ नावाच्या कथेमध्ये रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे.
स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षानंतर ही भटक्या जमातीच्या दुःखाचे गाठोडे त्यांच्या डोक्यावरून उतरले नाही. एक गाव नाही, घर नाही, सातबारा नाही. पोटासाठी नुसती भटकंती. यांना घरकुल द्यायचे म्हटले तरी त्यामध्ये कितीतरी राजकारण आडवे येते. प्रत्येक माणसाची किंमत त्याच्यामागे असणाऱ्या डोक्यांवर ठरू लागली. एकाकी असणारी माणसं अलगदपणे व्यवस्थेच्या बाहेर फेकली जाऊ लागली. भटकणारी ही लोकं महामुर गरिबीतही आपली इमानदारी विकत नाहीत. याच विषयावरती मी ‘कन्हैया’ नावाची कथा लिहिली.


माणसांनी जसे रंग बदलले तसा निसर्गही बदलत चालला. आज शहर आणि गाव यामध्ये एक दूषित हवा वाहते आहे. पावसाळ्यात भयंकर ऊन पडू लागले, तर उन्हाळ्यात पाऊस. पावसाळ्यातले सर्वच नक्षत्र कोरडे जाऊ लागले. पंचांगाचा पराभव करून ढग भुईच्या कोणत्या जन्मीचा सूड घेत आहेत कुणास ठाऊक! मराठवाड्यातील दुष्काळाची भयंकर दाहकता मी ‘हवा’ नावाच्या कथेमध्ये रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. समाजातील स्त्रिया, तृतीयपंथीय, वृद्ध यासारख्या दुर्लक्षिलेल्या घटकांभवती पडलेल्या समस्येचा ‘भोवरा’ आहे. यातून बाहेर पडण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करतो आहे. …. आणि हे सर्व मी माझ्या ‘भवरा’ या कथासंग्रहात रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे.

                   @ लेखक: विजय दि. जाधव 
                    मु. पो. गोंदी ,ता. अंबड, 
                    जि.जालना 
                    मो.नं.: ९६८९०८७४०६

लेखकाचा परिचय :

पूर्ण नाव: विजय दिगंबर जाधव, वात्सल्य बिल्डिंग, संभाजी नगर,जुन्या गॅस एजन्सी जवळ, अंबड. ता. अंबड, जि. जालना.

  • दूरध्वनी :९६८९०८७४०६
  • व्यवसाय: नोकरी
  • दाखला हा कथासंग्रह २०१४ मध्ये प्रकाशित
  • साने गुरुजी कथामाला पुरस्कार २०१५
  • शेष मराठी सा.पुरस्कार २०१५
  • यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकचा ‘बाबुराव बागुल कथा पुरस्कार’ दाखला कथासंग्रहास प्राप्त २०१५
  • महाराष्ट्र शासनाच्या जीवन शिक्षण या मासिकामध्ये गाभ्यामोड(मे २००८) ही कथा प्रकाशित.
  • जळगाव येथून प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिक शिवानी समाचार च्या कथालेखन स्पर्धेत ‘बरड’ या कथेस उत्तेजनार्थ पुरस्कार.
  • आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावर कथाकथन
  • नांदेड येथे २००७ मध्ये झालेल्या आविष्कार साहित्य संमेलनामध्ये निमंत्रित कवी म्हणून सहभाग.
    ‘साने गुरुजी’ या शंकर वाडेवाले यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद.
  • पांढरकवड्या ही कादंबरी २०१८ मध्ये प्रकाशित.
  • ‘पांढरकवड्या या कादंबरीचा स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेडच्या अभ्यासक्रमात समावेश २०१९
  • ‘शेत- शिवार प्रतिष्ठान’ पेठ शिवणी यांचा विठोबा वाडेवाले स्मृती पुरस्कार २०१९.
  • अहमदनगर जिल्हा वाचनालय आयोजित ‘पद्माकर डावरे राज्यस्तरीय विनोदी कथा लेखन’ स्पर्धेत मानव प्रगती मिशन या कथेस द्वितीय पुरस्कार २०१९
  • शब्दांगण पुरस्कार २०१८
  • सुखनाभुषण पुरस्कार २०२२
  • ‘भवरा’ कथा संग्रह मॉडेल कॉलेज घनसावंगी अभ्यासक्रमामध्ये २०२२ समावेश
  • ‘भवरा’ कथासंग्रहाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ छत्रपती संभाजीनगर एम. ए. द्वितीय वर्ष अभ्यासक्रमात समावेश २०२४

बालसाहित्याची कक्षा रुंदावणारी डॉ. संजय बोरुडे यांची नवी बालकादंबरी..

4 thoughts on “‘भवरा ‘च्या निर्मितीची कथा : विजय जाधव,अंबड”

  1. विजय जाधव यांच्या भूमिकेचा बेस हा बाबुराव बागुल यांच्या साहित्यावर बनलेला असल्यामुळे त्यांचे लेखन वास्तवाला सामोरे जाणारे असे आहे. या त्यांच्या निर्मिती प्रक्रियेनंतर त्यांचे समग्र साहित्य वाचण्याची उत्सुकता वाढून राहीली आहे…….

  2. खुप छान लिखाण आहे. सर तुमच… खरंच येणाऱ्या पिढीने जर तुमची हे पुस्तक वाचले तर त्यांना कोरोना मधील आपले जीवन नक्कीच समजेल…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top