सा हि त्या क्ष र

मनोहर तल्हार यांची जुनी मुलाखत

( प्रमोद मुनघाटे यांच्या फेसबुक वॉलवरून साभार.)

लोक म्हणतात, ‘माणूस’ नंतर तल्हार संपले…
जुनी मुलाखत१९९५ 

□■
“लोक म्हणतात, ‘माणूस’ नंतर तल्हार संपले, पण लेखक कधीच संपत नसतो. पाच-दहा वर्षांनंतर तो ज्वालामुखीसारखा स्फोट घेत असतो. पण दरम्यान त्याची ज्वालामुखी निद्रिस्त असते एवढेच. आणि त्याला कारणेही असतात. तुम्ही विचारता की, जीवनात कोणती गोष्ट राहून गेल्याची रूखरूख आहे. मी माणूस कादंबरीत शंकराचे अपघातात दोन्ही पाय जातात असे लिहिले होते. माझ्या जीवनात पुढे घडणाऱ्या घटनेचे जणू मीच पूर्वसंकेत दिले होते, असे मला आज वाटते. मी खामगावला असताना माझे वडील डोक्यावर सामान वाहून आणित असताना रेल्वेचे इंजिन कोसळले व त्यात त्यांचे दोन्ही पाय कापल्या गेले. अत्यंत तडफत्या अवस्थेतही त्यांनी सोबत असलेल्या धाकट्या भावाला खिशातील तिकिटे काढून दिली व दहा मिनिटात त्यांनी प्राण सोडला. त्यांच्या मृत्यूला मीच जबाबदार आहे असे वाटते. मीच त्यांना माझे सामान त्या पद्धतीने आणायला सांगितले होते. जीवनातील ही घटना मी अद्यापी शब्दबद्ध करू शकलो नाही हीच माझी रूखरूख आहे. या घटनेचा माझ्या मनावर एवढा परिणाम झाला की मी पुढे आठ-दहा वर्षे काहीच लिहू शकलो नाही, भ्रमिष्टासारखा झालो आणि लोक म्हणायचे ‘माणूस’ नंतर तल्हार संपला की काय?”

“जीवनात आणखी काही राहून गेल्याची रूखरूख आहे काय?” या माझ्या प्रश्नाला मनोहर तल्हार यांनी वरील उत्तर दिले. कुणाही सहृदय वाचकाला हादरवून टाकणारे हे उत्तर होते.

मराठी साहित्यात अव्वल सोने ठरलेल्या ‘माणूस’ कादंबरीचे लेखक मनोहर तल्हार यांनी प्रत्यक्ष किती सोसले होते, ते मला त्यांच्या बोलण्यातून कळत होते. मुलाखतीचे निमित्त होते, नागपूर जिल्ह्यातील अंभोरा येथे १९९५ मध्ये झालेल्या सत्तेचाळीसाव्या विदर्भ साहित्य संमेलनाचे त्यांनी स्वीकारलेले अध्यक्षपद.

 एकूण पाच कादंबऱ्या आणि पाच कथासंग्रह अशी निर्मिती नावाशी जमा असलेल्या तल्हारांची ‘माणूस’ नावाची कादंबरी प्रचंड गाजलेली. गेली कित्येक वर्षे सातत्याने लोकप्रिय ठरलेल्या या कादंबरीतील मनस्वी पात्राप्रमाणेच मनोहर तल्हार अतिशय भाऊक आणि मनस्वी व्यक्तिमत्त्वाचे आहेत. एखाद दुसरा अपवाद वगळता वाङ्मयातील जाणकारांनी आपल्या लेखनाची पुरेशी दखल घेतली नाही याची त्यांना खंत आहे, तर अतिसामान्य माणसातील माणूसपणाचा अत्यंत  साध्या-सरळ शैलीत शोध घेणाऱ्या या प्रतिभावंताला आपल्या प्रत्यक्ष जीवनातील अत्यंत दाहक अनुभव अद्यापिही आपण शब्दबद्ध करू शकलो नाही याची रूखरूख आहे. वाङ्मयीन क्षेत्रातील कोणत्याही वाद-प्रवाहाशी संबंध नसल्याचे सांगणारे मनोहर तल्हार अंभोऱ्याच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदानिमित्त कोणताही नवा ‘विचार’ आपल्याला मांडायचा नाही असे प्रामाणिकपणे सांगतात.

□आपल्या लेखनाला सुरूवात केव्हा व कशी झाली?
■ मी वयाच्या दहाव्या वर्षी व्ही. शांताराम यांचा ‘कुंकू’ चित्रपट पाहिला. त्यानंतर ‘माणूस’ आणि ‘शेजारी’. या तीनही चित्रपटांनी मी बालवयात झपाटून गेलो होतो. तेव्हापासून सिनेमाचा मला नादच लागला. चित्रपटाच्या तांत्रिक व सौंदर्यात्मक बाजूंचा विचार करण्याची मला सवयच जडली. तेव्हाच्या ‘तारका’ साप्ताहिकात मी १९४९ पर्यंत चित्रपट समीक्षा लेखन केले. पुढे ते बंद पडले आणि माझी समीक्षाही बंद झाली. पण याच खिडकीतून मला माझ्यातील लेखक गवसला. मी कथा लिहायला लागलो. अर्थात प्रारंभीच्या माझ्या कथा अनुकरणशील होत्या. आता त्या फाडून टाकाव्याशा वाटतात. १९५५ मध्ये मी एकूण वीस कथा लिहिल्या, तेव्हापासून वर्षाकाठी आठ-दहा कथा मी लिहीत आहे. कथालेखनातून मी कादंबरीकडे वळलो. माझी पहिली कादंबरी ‘माणूस’ ही मी १९६१ मध्ये लिहीली.

□ तुमच्या कुटुंबात काही वाङ्मयीन वारसा होता का? सुरूवातीला तुमच्या कथा कादंबऱ्याना प्रतिसाद कसा मिळाला?
■  नाही, तसा कोणताही वारसा मला मिळालेला नव्हता. लौकिकदृष्ट्या अत्यंत सामान्य कुटुंबात व परिस्थितीत माझा जन्म झाला. पण सूक्ष्म निरीक्षण आणि माणसांच्या स्वभावाचा अभ्यास करण्याचा नाद यामुळे माझ्या सभोवतालच्या सामान्य माणसांनी मला कथा-कादंबऱ्यांचे विषय दिले. अतिशय बारकाईने चित्रपट बघण्यामुळे मला कथांची वर्णनशैली आपोआप अवगत झाली.
१९६० पर्यत पन्नास-साठ कथा लिहिल्या. पण जवळच्या मित्रांनी दाद देण्यापलीकडे, महाराष्ट्रातील कोणत्याही समीक्षकाने दखल घेतली नव्हती. अर्थातच मासिकांकडून ‘साभार’ कथा परत येण्याच्या काळात या गोष्टीचे सोयरसुतक मला नव्हते. ‘माणूस’ प्रकाशित झाल्यावर मात्र हे चित्र बदलले. परंतु ‘माणूस’ प्रसिद्ध झाल्यावरही ती चांगली आहे की सामान्य आहे याविषयी दहा-पंधरा वर्षे काहीही चर्चा झाली नाही. ती दुर्लक्षित राहिली. आणि एकाएकी १९७० नंतर मात्र रसिकांनी ‘माणूस’चे खरे स्वागत केले. मला आता त्याबाबत काही वाटत नाही. कारण जाणीवपूर्वक माझ्या कादंबरीवर कोणी लिहावे, चर्चा व्हावी म्हणून मी कधीच कोणत्या समीक्षकाजवळ गेलो नाही. कोणत्याही साहित्यिक कंपूमध्ये गेलो नाही.

□ पण ‘माणूस’ची पुढे एका वाङ्मयीन वादाच्या दृष्टीतून बरीच चर्चा झाली. एखाद्या वैचारिक प्रवाहाचा लेखक म्हणून आपणास लेबल मान्य आहे काय?
■  तुम्ही म्हणता तसे सामान्यातील सामान्य माणसाचा जीवनसंघर्ष मूल्यसंघर्ष वगैरे कोणतीही तात्त्विक किंवा वैचारिक भूमिका माझ्यापाशी कधी नव्हती, आताही नाही. मी मुळातच माणसांचा आतून-आतून शोध घेत असतो. माझ्या सहवासात आलेल्या व्यक्तींचे माझ्या मनावर कायम ठसे असतात. माझ्या लेखनात त्या व्यक्ती अपरिहार्यपणे येतात. माझी वर्णनशैली अतिशय वास्तवदर्शी आहे, असे मला वाटते. त्यामुळे सामान्यातील सामान्य माणूस माझ्या कथा-कादंबरीचा नायक होतो. यापेक्षा आणखी काही वेगळी माझी वैचारिक भूमिका नाही.

माझ्या मते कोणत्याही प्रतिभावंत लेखकाची पहिली कलाकृती ही त्याचे अप्रत्यक्ष आत्मचरित्रच असते. इतर कलाकृती या नुसत्या आवृत्त्या असतात. ‘माणूस’ नंतर माझ्या सर्व कादंबर्यांवर तसाच प्रभाव झाला असावा.
‘माणूस’ ही कादंबरी लिहिताना कादंबरीचा घट, तंत्र-मंत्र हे काहीच डोक्यात नव्हते. जशी कागदावर उतरत गेली तशी उतरली. त्यावेळी मी एका वेगळ्याच भावावस्थेत होतो. १९७० ते ८० या कालावधीत माणूस कादंबरीचे अनेकांनी वेगवेगळ्या दृष्टीतून मूल्यमापन केले. परंतु माझ्या कादंबरीची खरी समीक्षा जर कोणी केली असेल तर ती, डॉ. या. वा. वडस्कर यांनी. त्यांना माझ्या लेखनात कोणतीही वैचारिक भूमिका दिसत असो, त्यांनी अत्यंत समरसतेने माझ्या लेखनातील ताकद समाजासमोर प्रकट केली, याबद्दल माझ्या मनात कृतज्ञतेची भावना आहे.

□ परंतु एकूणच मराठी समीक्षकांविषयी आपण समाधानी आहात का?
■  नाही. आपल्या वाङ्मयीन जाणकारांचा स्वभाव आहे किंवा नाही ते मला माहीत नाही. पण कोणीही मनापासून साहित्य आवडल्याची किंवा न आवडल्याची प्रतिक्रिया देत नाही. सर्व हातचे राखून बोलतात किंवा लिहितात. आजवरच्या चाळीस वर्षाच्या माझ्या वाङ्मयीन जीवनात फक्त मनापासून दाद देणाऱ्या एकाच माणसाचे नाव मी सांगतो, ते म्हणजे पु. ल. देशपांडे. खरोखरच मोठ्या मनाचा माणूस. अमरावतीत विदर्भ महाविद्यालयात व्याख्यानाला आले असता प्राचार्य डॉ. वि. भि. कोलते यांचे हस्ते निरोप पाठवून पु. लं. नी मला बोलावून घेतले. मी फारच भारावून गेलो. तसाच दुसरा प्रसंग व्ही. शांताराम यांच्या भेटीचा. त्यांच्या अनेक चित्रपटांवर मी लिहिले होते. मी लहानपणापासून त्यांचा फॅन होतो. ते आमचे हिरोच होते. नागपुरात एकदा मुक्कामाने आले असता, त्यांनी मला भेटण्याची परवानगी दिली, अत्यंत प्रेमाने जवळ घेतले, हे काही प्रसंग मी विसरू शकत नाही.

□ आपल्या लेखनामागे काही प्रेरणा आहेत काय?
■ माझी आई आणि माझे वडील यांचे संस्कार हीच माझी प्रेरणा आहे. त्यातूनच मी लिहीत गेलो. मला कोणीही गुरू नव्हता. गुरू करण्याची इच्छाही नव्हती. कोणते आदर्शही नाहीत. चित्रपट बघण्याचा नाद व प्रत्येक घटना बारकाईने, तपशीलवार टिपण्याचा छंद यातूनच सभोवतालच्या व्यक्तींना शब्दबद्ध करण्याची कृती माझ्या हातून होते.

□ अंभोरा येथील सत्तेचाळीसाव्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाकरिता निवड झाल्याबद्दल आपले अभिनंदन! अध्यक्षपद मिळाल्याबद्दलची आपली प्रतिक्रिया सांगू शकाल?
■ अध्यक्षपद मिळाल्याचा अर्थातच आनंद आहे. परंतु मी लेखक असलो तरी कोणी मोठा विचारवंत किंवा फर्डा वक्ता नसल्याने अशा संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ गळîात पडावी असे मला कधी वाटले नव्हतेच. मला रक्तदाबाचा विकार आहे. चार-सहा मित्रात तावातावाने बोलण्याची मला सवय असली तरी ‘श्रोत्यां’च्या पुढे उभे राहिले की माझ्या हाता-पायांना कंप फुटतो. कधी कधी तर माझ्या तोंडून शब्दच बाहेर पडत नाही. अशा माझ्या मानसिक व शारीरिक अवस्थेत संमेलनाच्या अध्यक्षपदावरून तासभर बोलणे म्हणजे डोक्यावर पहाड घेऊन तीन-चार मैल फिरण्याइतके कठीण होते, असो. साहित्य संघाच्या   पदाधिकार्यांना नकार देणे मला जमले नाही. पण अध्यक्षपदाबाबत मी अत्यंत आनंदी आहे.

□ तुम्हाला तुमचे आवडलेले पुस्तक कोणते?
■  ‘माणूस’

□आवडणारे लेखक कोण?
■ चेकाव्ह, टालस्टाय, दास्तो व्हॅस्की, रवींद्रनाथ, शरदचंद्र, प्रेमचंद, फणीश्वरनाथ रेणू आणि मराठीत श्री. ना. पेंडसे, जी. ए. कुळकर्णी, जयवंत दळवी, गाडगीळ-गोखले, भालचंद्र नेमाडे आणि नागनाथ कोतापल्ले.

□आवडते नट?
■ चार्ली चॅप्लीन, लार्ड गेबल, इन्ग्रिड बर्गमन, नार्मा सिएटर, ग्रेटा गार्बो, दिग्दर्शकांपैकी सत्यजित रे, व्ही. शांताराम, गुरूदत्त, राजकपूर, देवकी बोस, मेहबूब खान, राजा परांजपे आणि राजदत्त.

□आता शेवटचा प्रश्न: अंभोऱ्याच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून आपण काही नवा विचार मांडणार आहात काय?
■ काहीही नाही! जे बोलावेसे वाटले ते लिहून काढले. कोणाला मार्गदर्शन करावयाचे नाही. कोणाविषयी आकस नाही, कोणत्या गटाविषयी प्रेम नाही. वाङ्मयातील सृजनशीलता प्रामाणिक असावी एवढा एकच ध्यास आहे.

(मुलाखतीचे श्रेय : Praveen Bardapurkar )

□■
-प्रमोद मुनघाटे
( पूर्वप्रसिद्धी : लोकसत्ता, नागपूर दि. ६ जानेवारी १९९५ )

सृजन संवाद : प्रमोद मुनघाटे
तनुजा प्रकाशन, नागपूर, २००६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top